ब्रेकींग : मुक्ताईनगरातील गौण खनिज घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ; ईटीएस पथक दाखल

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाच्या ईटीएस पथक दाखल झाले असून चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या वृत्ताला भुसावळ व मुक्ताईनगरचे प्रांताधिकारी रामसिंह सुलाने यांनी दिला आहे.

हिवाळी अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यात ३३ हेक्टर ४१ आर जमीनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप करून विधानसभा लक्षवेधी केली होती. या अनुषंगाने राज्य शासनाचे ईटीएस विभागाचे पथक आज मुक्ताईनगर तालुक्यात दाखल झाले असून गौण खनिज उत्खननाच्या ४०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीला सुरूवात केली आहे.

काय आहे हे प्रकरण ?
हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले, या अधिवेशनात आमदार चंद्रकांत पाटील यांनी २६ डिसेंबर रोजी सांगितले होते की, मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली. असा आरोप केला.

आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जानेवारी २०१९ मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल ४०० कोटी रूपयांचा घोळ झाल्याचा सनसनाटी आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता. या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

ईटीएस पथकाकडून चौकशीला सुरूवात
या अनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या गौण खनिज उत्खननाची चौकशीसाठी राज्य शासनाचे ईटीएस पथक दाखल झाले असून घोटाळ्याच्या चौकशीला सुरूवात केली आहे. पथक दाखल झाल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या वृत्ताला मुक्ताईनगर व भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंह सुलाने यांनी दुजोरा दिला आहे.

Protected Content