Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयुध निर्माणीच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा : सुर्यवंशी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीतील बालिकेच्या झोपाळ्यावरून पडून झालेल्या मृत्यू प्रकरणी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, भुसावळातल्या धम्म नगरातील रहिवासी अरुण सावळे हे आयुध निर्माणी वरणगाव येथे सोमवार दि.१५ रोजी विवाहासाठी गेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी समिक्षा (वय ६) ही बुद्ध विहारातील झोपाळ्यावर खेळत होती. यावेळी पाळणा जमिनीपासून उघडून निघाल्याने समीक्षा जबर जखमी झाली. आणि उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आयुध निर्माणीतील अधिकार्‍यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी केले आहे.

या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजू सुर्यवंशी म्हणाले की, या घटनेला व्यवस्थापकीय अधिकार्‍यांचा निष्काळजीपणा व हलगर्जी जबाबदार आहे. समीक्षाच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील सुर्यवंशी यांनी याप्रसंगी दिला.
याप्रसंगी राजू सुर्यवंशी यांच्यासह मृत बालिकेचे वडील अरुण सावळे, रवी सपकाळे, शरद सोनवणे, पप्पू सुरवाडे, सुनील ढिवरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version