भुसावळातील अमृत योजनेचे काम पूर्ण करा : आपची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील अमृत योजनेचे काम रखडले असून ते तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आलेली आहे.

आम आदमी पक्षाचे पदाधिकारी दिलीप सुरवाडे यांनी भुसावळ शहरातील अमृत पाणी पुरवठा योजनेबाबत निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या बाजूलाच तापी नदी असली तरी भुसावळकरांना अद्यापही पाण्यासाठी वणवण करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. अमृत पाणी पुरवठा योजना रखडल्यामुळे याचा त्रास शहरवासियांना भोगावा लागत आहे.

दरम्यान, या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तब्बल ३५२ कोटी रुपयांच्या सदर योजनेच्या माध्यमातून शहरात पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. मात्र, सध्या शहरात सन १९५२ मध्ये टाकलेल्या पाइप लाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही पाइपलाइन जीर्ण झाल्याने वारंवार गळती लागते. त्यामुळे अमृत योजनेचे काम पूर्ण करून भुसावळकरांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

Protected Content