भुसावळ प्रतिनिधी । जनआधार आघाडीच्या चार नगरसेवकांच्या अपात्रतेला स्थगितीची माहिती मिळण्याआधीच अजेंडा पाठविण्यात आल्याची माहिती आज मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.
कालच माजी आमदार संतोष चौधरी यांनी जनआधारच्या चार नगरसेवकांच्या अपात्रतेला स्थगिती मिळाल्याची माहिती देतांना नगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या मते संबंधीत चारही सदस्य पात्र झाल्याची माहिती असूनही प्रशासनाने त्यांना २८ रोजीच्या सभेचा अजेंडा पाठविला नाही. यामुळे ही सभा बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला होता. या पार्श्वभूमिवर, आज मुख्याधिकारी दोरकुळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हायकोर्टाचा निर्णय हा २५ फेब्रुवारी रोजी अपलोड झाल्याचे दिसत आहे. तर नगरपालिकेला २६ रोजी मेल आला आहे. यात हायकोर्ट ऑर्डर असे नमूद केले असले तरी याला अटॅचमेंट जोडलेली नाही. यातच २८ च्या सभेच्या अजेंडा हा आधीच पाठविण्यात आला होता. यामुळे जनआधार आघाडीच्या त्या चार सदस्यांना टाळण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
पहा– भुसावळचे मुख्याधिकारी दोरकुळकर नेमके काय म्हणाले ते !