Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईडीच्या कारवाईतून अभय मिळाल्यानेच वाजतोय ‘भोंगा’ : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने ईडीच्या कारवाईपासून अभय दिल्यामुळेच राज ठाकरे यांचा भोंगा असल्याची टीका करत संजय राऊत यांनी राज यांचा भोंगा जनताच बंद पाडेल असा इशारा देखील दिला आहे.

काल राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत अतिशय आक्रमक भाषण केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता त्यांना उत्तर दिले जात आहे. या अनुषंगाने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी राज यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाल की, भाजप आमच्याशी थेट लढू शकत नाही. त्यामुळे आता ‘असे’ भोंगे लावून माहौल तयार केला जात आहे. ईडीच्या  कारवाईपासून अभय मिळाल्यामुळेच हा भोंगा वाजत आहे. आम्ही ईडीच्या कारवाईला सामोरे जातोय, त्यांच्याशी लढतोय. त्यामुळे आम्हाला चिंतेचे कारण वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, खोट बोललात तरी शिवसेना आणि महाविकास आघाडी भक्कम आहे. एका वैफल्यातून आणि निराशेतून हे भोंगे वाजू लागले आहेत. भाजपचे भोंगे लावून उपयोग झाला नाही. त्यामुळे आता हे भोंगे लावण्यात आले आहेत. मात्र जनताच हे भोंगे उतारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, राऊत म्हणाले की, राज्य सरकारला अल्टिमेटम कोणीही देऊ शकत नाही. अल्टिमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती. बाळासाहेब ठाकरे यांनी या देशातील अतिरेक्यांना अल्टिमेटम दिला होता. अमरनाथ यात्रा किंवा वैष्णोदेवी यात्रेवरून अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत या देशात फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती. आजचा जो अल्टिमेटम आहे, हा जो भोंगा वाजतोय, हा भाजपचाच भोंगा आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

 

Exit mobile version