Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बहिणाबाईंनी काव्यातून मानवी जीवनमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले – डॉ. अतुल देशमुख

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान साध्या सोप्या भाषेत आपल्या काव्यातून मांडले. त्यासाठी माध्यम म्हणून त्यांनी आपली मायबोली निवडली. शेती, शेतकरी, मजूर, सासर, माहेर, आखाजी, नागपंचमी असे साधे विषय घेऊन मानवी जीवनाचे मर्म आपल्या काव्यातून बहिणाबाई मांडत राहिल्या. लौकिक अर्थाने निरक्षर असणाऱ्या बहिणाबाईंनी मानवी जीवनमूल्यांचे महत्व अधोरेखित केले, असे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी केले.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. एस. डी. भैसे होते. त्यांनी याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

इतिहास विभागप्रमुख डॉ.सी.एस. पाटील यांच्या हस्ते निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयंती-पुण्यतिथी समितीचे प्रमुख प्रा. शिवाजी पाटील यांनी केले तर डॉ. गजानन चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. एस. ए. कोळी, प्रा. डी. ए. मस्की, डॉ .बी.एस. भालेराव, प्रा. आर. एम. गजभिये, डॉ. सचिन हडोळतीकर, डॉ. इंदिरा लोखंडे, डॉ . जनार्दन देवरे, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. ज्योती नन्नवरे, प्रा. प्रवीण देसले, प्रा. मानसिंग राजपूत, प्रा. मोहनदास महाजन यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

 

Exit mobile version