Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमच्या तक्रारींची दखल घेतलीच नाही : शंभुराज देसाई

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत हे शिवसेनेला संपविण्याचे काम करत असतांना आमच्या तक्रारींची उध्दव ठाकरे यांनी दखलच घेतली नसल्याचा आरोप करत माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना शंभुराज देसाई यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. यात त्यांचा विशेष रोष हा संजय राऊत यांच्यावर असल्याचे दिसून आले. राऊत यांनीच शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभुराज देसाई यांनी नाव न घेता केला आहे. शिवसेनेचे आमदार वारंवार याबाबत उद्धव ठाकरेंना सांगत होते पण त्यांनी ऐकलं नाही, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार एका बाजूला गेले आहेत. अजून काही जण आमच्या सोबत येणार आहेत. आमदारांचं का बरं ऐकलं गेलं नाही? कुणाच्या सल्ल्यामुळं ऐकलं गेलं नाही? कोणाच्या सांगण्यामुळं ऐकलं गेलं नाही? नेत्यांनी आता हा विचार केला पाहिजे की, हे ४० लोक आपल्याला जे सांगत होते त्यात आता तथ्य आढळून आले असल्याचे म्हणत त्यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्यावरही टिका केली.

Exit mobile version