बोरी धरणाचे १५ दरवाजे उघडले; नदी काठावरील गावांना इशारा

अमळनेर प्रतिनिधी | बोरी नदीवरील तामसवाडी येथील मध्यम प्रकल्पाचे रात्री १५ दरवाजे उघडण्यात आले असून प्रशासनाने खालील बाजूस नदीच्या काठी राहणार्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्प हा गेल्या आठवड्यातच पूर्ण भरला असून आधी देखील यातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आता धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे.

या अनुषंगाने प्रकल्पाचे १५ दरवाजे हे रात्री सव्वानऊच्या सुमारास उघडण्यात आले आहेत. यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे खालील बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. कृपया जीवित वा वित्त हाणी टाळण्याचे दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन अमळनेर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी केले आहे.

Protected Content