कचरा कुंडीच्या जागी अवतरले क्षणभर विश्रांती केंद्र

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गल्लीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच असलेली कचराकुंडी हटवून त्याठिकाणी जेष्ठ नागरिक व आबाल वृद्धांसाठी क्षणभर विश्रांतीचे केंद्र साकारण्याची किमया श्री राजे शहाजी मित्र मंडळ, न्यू प्लॉट परिसर आणि विकास मंचने केली आहे.

अमळनेर नगरपरिषदेच्या सहकार्याने हे कार्य मार्गी लागले आहे. न्यू प्लॉट परिसरातील शनी मंदिर गल्ली जवळील अजय अरुण कुळकर्णी यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ त्याच्या दशक्रियेच्या दिवशीच विश्रांती केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या विश्रांती केंद्रासाठी स्वप्निल सोनार व स्नेहिल सोनार या बंधूनी देखील आपले वडील चंद्रकांत सिताराम सोनार यांच्या स्मरणार्थ दोन सिमेंट बेंच जनहितार्थ भेट देऊन या कार्याला हातभार लावला. लोकार्पण प्रसंगी या ठिकाणी वड आणि पिंपळ आदी वृक्ष लावून भविष्यात हे विश्रांती केंद्र वृक्षाच्या गार सावलीत असेल याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे विश्रांती केंद्र न्यू प्लॉट भागात शनिमंदिर गल्लीच्या प्रवेशद्वारावर साकारण्यात आले असून या ठिकाणी अनेक दिवसांपासूनच कचराकुंडी असताना वाईट चित्र दिसत असल्याने राजेशहाजी मंडळ आणि न्यू प्लॉट विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी हा परिसर स्वच्छ करून येथे विश्रांती केंद्र साकारण्याची संकल्पना मांडली होती.

यासाठी दोन्ही मंडळाच्या सदस्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत दिली तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पालिकेचे जेसीबी उपलब्ध केल्याने सिमेंटची कचराकुंडीची तोडफोड करून नष्ट केले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून दिला. यानंतर येथे सिमेंट काँक्रीटचा प्लॅन ओटा करून रंगरंगोटी करण्यात आली. याठिकाणी कुणी घाण टाकू नये यासाठी स्वच्छतेचा संदेश लिहिण्यात आला. विश्रांतीसाठी मजबूत सिमेंट बाक ठेवण्यात आले. यामुळे येथील रूपच पूर्णपणे बदलून गेले. यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

विश्रांती केंद्राचे लोकार्पण जेष्ठ समाजसेवक प्रकाशचंद्र पारख यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी न.प.चे ‘माझी वसुंधरा’चे नोडल अधिकारी संजय चौधरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शहरातील इतर मंडळांनी देखील या उपक्रमाची दखल घ्यावी असे आवाहन केले.

डॉ शरद बाविस्कर, डॉ दीपक धनगर, अँड राजेंद्र चौधरी, मकसूद बोहरी, उदयकुमार खैरनार, पत्रकार किरण पाटील, प्रसाद शर्मा, डॉ संजय शाह, सुहास बोरकर, जितेंद्र पारख, जयदीप पवार, गुलाब चौधरी, प्रशांत पारेख, न.प.चे आरोग्य निरीक्षक वाय एस चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, मुकादम ज्ञानेश्वर संदानशीव, आबा माळी, भावडू पाटील, सुनिल गोसावी, योगेश चौधरी, विक्रम शाह, प्रणित झाबक तसेच मंडळाचे सदस्य महेश राजपूत, अतुल राजपुत, हार्दिक खिलोसिया, प्रशांत लंगरे, केयुर ठक्कर यासह कु नयना कुळकर्णी व स्व अजय कुळकर्णी यांचे कुटुंबीय व मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी मंडळाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी पालिकेसह सर्वांचे अनमोल सहकार्याबद्दल आभार मानले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

या उपक्रमाची पालिकेने दखल घेऊन ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत त्यांच्या फेसबुक पेजला या उपक्रमाची प्रसिद्धी दिली.

चेतन राजपूत, स्नेहिल सोनी, योगेश पवार, आबा माळी, भद्रेश शाह, राकेश सोनवणे, महेश राजपूत, प्रणव मुंडके, बंटी ठक्कर, तेजस नवसारीकर, अजय पवार, पंकज लंगरे ,चंद्रकांत पाटील, सुहास परदेशी, अँड. राजेंद्र चौधरी, स्वर्णदीप राजपूत, शुभम वैष्णव, विपुल मोरे, राहुल शर्मा, सचिन बुधा पाटील, पवन शर्मा, दीपक दाभाडे, हार्दिक खिलोसिया यांनी या कार्यासाठी आर्थिक योगदान दिले.

Protected Content