Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची घोषणा

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । तिन्ही केंद्रीय कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला संपूर्ण भारत बंदचे आवाहन केले आहे, असे हरिंदर पाल लखोवाल यांनी सांगितले.

कृषी कायद्यांसंदर्भात गुरुवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर शेतकरी संघटनांनी पुन्हा बैठक बोलावून आपसात चर्चा केली. या बैठकीनंतर संयुक्त शेतकरी आघाडीने पत्रकार परिषद घेतली.

सरकार या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार आहे, मात्र सरकारने हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत अशीच आमची मागणी असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले. आम्ही सरकारशी कालच चर्चा केली आहे आणि हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत असे आम्ही सरकाला स्पष्टपणे सांगितले आहे, असे सिंधु सीमेवर झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हरिंदर पाल लखोवाल यांनी सांगितले.

 

सरकार वीज कायदा आणि पेंढा जाळण्यासंदर्भातील दंडाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य असल्याचे दिसत असल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांनी येथे यावे असे आमचे म्हणणे आहे. ही लढाई आरपारची आहे. आम्ही मागे हटणारे नाहीत.

या व्यतिरिक्त आम्ही ८ डिसेंबरला संपूर्ण देशात टोल प्लाझा मोफत करणार असून दिल्लीतील उरले सुरले सर्व रस्तेही बंद करणार आहोत, असेही शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. शेतकरी उद्या ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळाही जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

९ दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणासह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी दिल्लीला लागून असलेल्या विविध राज्यांच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ‘दिल्ली चलो’ नावाने सुरू झालेले हे आंदोलन आता देशव्यापी बनले आहे. येथे जमा झालेल्या शेतकरी आणि आंदोलकांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच त्यांना मिळणारे समर्थनही वाढतानाच दिसत आहे.

Exit mobile version