१८ ते ४४ वयोगटासाठी राज्याचा कोरोना लसीकरणाचा अपेक्षित खर्च ७ हजार ५०० कोटी !

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात  “५ कोटी ७१ लाख लोकं १८ ते ४४ या  वयोगटातील आहेत. त्यांना दोन लसींचे डोस द्यायचे तर १२ कोटींच्यादरम्यान लसी लागणार आहेत. त्याचा खर्च साडेसात हजार कोटींच्या वर जाईल,” असे आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

 

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील किती जणांना हे लसीकरण केलं जाणार आहे, त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, किती लसी लागणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली  एक मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या तयारीसंदर्भातही टोपेंनी भाष्य केलं आहे.

 

“आपण सर्वच जण १ मे ची वाट पाहत आहेत १८ ते ४४ वर्षाच्या लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर टाकण्यात आलीय. ही जबाबदारी स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आम्ही मंत्रीमंडळाला एक नोट तयार करुन पाठवली आहे. यामध्ये मोफत दिली तर किती खर्च, काही घटकांना मोफत दिली तर किती खर्च यासंदर्भातील वेगवेगळे पर्याय आणि आकडेवारी देण्यात आलीय,” असं टोपे म्हणाले.

 

 

 

राज्यातील सर्व नागरिकांना लस मोफत द्यावी का यासंदर्भातील निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. लवकरच मंत्रीमंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये लसीकरणासंदर्भातील निर्णय घेतला जाईल आणि तो मुख्यमंत्री जाहीर करतील असं टोपे म्हणालेत. मात्र त्याच वेळी त्यांनी १ मे पासून सुरु होणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी लस उपलब्ध करुन देण्याबद्दल भारतात लसनिर्मिती करणाऱ्या दोन्ही कंपन्यांकडे विचारणा केल्याचे सांगत दोन्ही कंपन्यांकडून उत्तर आलेलं नाही असंही म्हटलं आहे.

 

राज्य लसी खरेदी करण्यासाठी आणि लसीकरणासाठी तयार असलं तरी लसींची उपलब्धता हा सर्वात मोठा प्रश्न आहे, असंही टोपे म्हणाले आहेत. “आम्ही खरेदी करायला तयार आहोत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर व्यास यांनी कोव्हिशिल्डसाठी सीरमला आणि कोव्हॅक्सिनसाठी भारत बायटेकला पत्र लिहिले आहेत  दोन दिवसांपासून काहीच रिप्लाय आलेला नाही. आम्ही स्पष्ट सांगितलं आहे आम्हाला बारा कोटी लसी हव्या आहेत. तुम्ही कशा देणार, किती रुपयांना देणार, आम्ही पैसे कसे देऊ त्याचं शेड्यूल कसं असणार अशी विचारणा राज्य सरकारकडून करण्यात आलीय. या मागणीचा अर्थच एवढाय की या पत्राच्या माध्यमातून आम्ही लसीकरणांसाठी कटीबद्ध आहोत हे दिसून येत आहे,” असं टोपे म्हणाले  कोव्हिशिल्डसंदर्भात २० मे नंतरच बोलावं असं आम्हाला सांगण्यात आलं आहे , असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत दीड कोटींहून अधिक व्यक्तींचं लसीकरण झाल्याची माहिती टोपेंनी दिलीय. दीड कोटी लोकांचं लसीकरण आतापर्यंत करण्यात आलं आहे. ५ लाख ३४ हजार ७२२ जणांचं २६ एप्रिलरोजी राज्याभरात लसीकरण करण्यात आलं. योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास व्यापक लसीकरणाअंतर्गत राज्यात एका दिवसामध्ये आठ लाख नागरिकांचं लसीकरण शक्य आहे, असंही टोपे म्हणाले

Protected Content