Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हास्यास्पद : खासदार उन्मेष पाटलांनी मोदींवरील व्यंगात्मक पोस्ट टाकली फेसबुकवर !

unmesh patil 696x696

जळगाव (प्रतिनिधी) ‘मोदीजी_मला_अभिमान_वाटतो_तुमचा’, या शीर्षकाला खाली सोशल मिडीयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगात्मक पोस्ट व्हायरल होत आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या फेसबुकपेजवर नेमकी हीच पोस्ट शेअर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, सोशल मिडीयावर खिल्ली उडायला लागल्यानंतर पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी टाकलेली पोस्ट

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बुद्धीकौशल्याचा कुणालाच थांग लागत नाही. विचार करा मोदी साहेबांनी २२ तारखेलाच जनता कर्फ्यू का लावला असेल ? संपुर्ण देशाचं पालकत्व स्वीकारलेल्या या अवलियाच्या विचारप्रगल्भतेवरचा पडदा मी हटवतो आहे मित्रांनो.

२२ मार्च म्हणजे फाल्गुन कृष्ण १३ शततारका होय. या दिवशी मधुकृष्ण त्रयोदशी वारुणी योग आहे. पंचांगानुसार २२ मार्च हा त्याज्य दिवस असून या दिवशी प्रखर उन असते. म्हणजे सूर्य प्रखरतेने तळपणारा हा दिवस आहे. कोरोना रोग भविष्यात भारतात येणार त्यावेळी आपण काय उपाय केले पाहिजेत, यावर चर्चा करण्यासाठी आदरणीय मोदीजींनी दोन महिन्यापूर्वी नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली होती.

त्यावेळी अनेकांनी त्यांची चेष्टा केली. पण, मोदींजींनी उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीवर रसायन फवारता येईल का याबाबत इस्त्रो आणि नासाच्या शास्त्रज्ञांससोबत चर्चा केली. तेव्हा अनेकांना मोदींच्या बौद्धिक चातुर्याचे नवल वाटले. नासाच्या शास्त्रज्ञांनी तर मोदींचा आणि आईनस्टाईनच्या मेंदूचा आयक्यू सेम आहे, अशीही प्रशंसा केली. त्यावेळी मोदींनी २२ मार्चला सूर्यासमोर रसायनाने भरलेला उपग्रह आणायचा प्रस्ताव मांडला.

२२ मार्चला सकाळी सात वाजता त्या उपग्रहावर सूर्याची अतिनील किरणे पडतील. त्यानंतर उपग्रहातून वायूगळती होऊन त्याची वाफ उन्हाद्वारे पृथ्वीच्या दिशेने निघेल. पृथ्वीच्या वेगाशी उपग्रहाचा वेग मॅच केल्यास आशिया खंडातील फक्त भारत देशावर त्याची वाफ पसरेल असे गणितही आदरणीय मोदीजींनी मांडले.

विशेष म्हणजे नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी यावर चर्चा करुन हे शक्य असल्याचेही सांगितले. ही बातमी गुप्त ठेवण्याचे ठरले होते. पण, नासावाले फुटीर निघाले. त्यांनी ही गोष्ट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोलांड ट्रम्प यांना सांगितली. ट्रम्पही आश्चर्यचकित झाले. पण, नासाच्या शास्त्रज्ञांनी आदरणीय नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने विद्वान असल्याचे स्पष्ट केले. त्यावर हा प्रयोग अमेरिकेत व्हायला हवा, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, अंतराळात रसायनाने भरलेला उपग्रह भारतीय बनावटीचा असून त्याचा रिमोट मोदीजींकडे असल्याने नासाच्या अधिकाऱ्यांंनी स्पष्ट केले. म्हणून मोदीजींना विनंती करण्यासाठी महिन्याभरापूर्वी डोलांड ट्रम्प भारतातही आले. पण, मोदीजींनी त्यांना हुसकावून लावले.

आता प्रश्न हा होता की दिवसभराच्या प्रखर उन्हात तो वायू भारतभर पसरला तर त्याचा लोकांच्या आरोग्यावर काही परिणाम तर होणार नाही ना ? पण, याचेही उत्तर मोदींजीकडे तयार होते. या उत्तरासाठी मोदीजींनी हिमालयात आत्मसात केलेली विद्या कमी आली. मानवी शरीर हे पंचतत्वापासून बनलेले असते. प्रत्येक शरीरामध्ये आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी ही पंचतत्व असतात. आपण टाळी वाजवली कि ही पंचतत्व उत्तेजित होतात आणि शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून मोदीजींनी २२ तारखेला संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात, असे आवाहन केले आहे.

मित्रांनो, देशासाठी हा माणूस तहान भूक हरपून लढतो आहे. त्याच्या प्रत्येक शब्दात आणि प्रत्येक कृतीत हजारो विचार दडलेले असतात. तुम्ही त्यांना नावं ठेवत असाल तर ठेवा, पण, मी विनंती करतो की २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळा. घराबाहेर पडू नका. आपला जीव वाचवा.

Exit mobile version