Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सेलिब्रिटींवर दबाव आणून शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करण्यास भाजपने भाग पाडले

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  भाजपने सेलिब्रिटींवर दबाव आणून शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करण्यास भाग पाडले, हा काँग्रेसचा आरोप खरा सिद्ध झाला आहे. पोलिसांच्या  चौकशीत भाजपचा आयटी सेल आणि इतर १२ व्यक्तींची नावं समोर आली आहेत.  त्यांच्यावर  कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

 

यासंदर्भात  सावंत म्हणाले की, भाजपने  राष्ट्रीय हिरोंवर दबाव आणून त्यांना ट्विट करण्यास भाग पाडले असा आरोप काँग्रेसन केला होता.   भाजपाच्या चौकशीची मागणीदेखील केली होती. अनेक दिवस उलट्यानंतरही  हिरोंपैकी एकाही व्यक्तीने पुढे येऊन  ट्विटद्वारे मांडलेले मत हे त्याचे स्वतःचे होते असे सांगितले नाही. देशपातळीवर एवढे मोठे वादळ उठून   जे. पी. नड्डा,  प्रकाश जावेडकर आणि  देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपातर्फे केलेले षडयंत्र लपवण्याचा प्रयत्न केला, तरीही या सेलिब्रिटींचं मौन भाजपाच्या षडयंत्राबद्दल बरंच काही सांगून जातं.

 

 

सावंत म्हणाले की,  भाजपाचा कुटील चेहरा लपवता यावा यासाठी भाजपाचे नेते   लता मंगेशकर व सचिन तेंडूलकर यांच्या मागे लपत आहेत.  महाराष्ट्र सरकार या भारतरत्नांची चौकशी करणार, असा खोटा कांगावा भाजपकडून सुरु होता. परंतु आता सत्य समोर आले असून पुढच्या चौकशीमधून भाजपचा देशविरोधी कट समोर आल्याशिवाय राहणार नाही असे सावंत यांनी सांगितले.

 

देशासाठी सर्वाधिक घातक व विषारी टूलकिट हे भाजपचे असून या टुलकिटमधून भारतीय लोकशाही नष्ट करण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सावंत म्हणाले की, मोदी सरकारची छाती किती पोकळ आहे हे सिद्ध झाले आहे. त्यांनी पर्यावरणवादी दिशा रवी या युवतीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून ही बाब सिद्ध केली आहे. दिशा रवीबरोबर महाराष्ट्रातीलही काही जणांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यामागे भाजपचा कुटील डाव आहे. युवापिढी व मध्यमवर्गाचा आवाज दाबला जावा आणि गरिब शेतकऱ्यांबरोबर तो आवाज सामील होऊ नये हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट आहे.

 

सचिन सावंत म्हणाले की, देशातील विचारवंतांचा आवाज अशाच प्रकारे मोदी सरकारने दाबला आहे. परंतु हेच मोदी सरकार बालाकोटसारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर अर्णब गोस्वामीकडे अगोदरच माहिती कशी आली याची साधी विचारणाही करत नाही. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचे उल्लंघन झालेले असतानाही त्याच्यावर खटला का दाखल होत नाही, हा प्रश्न निश्चितपणे जनतेसमोर आहे. दिल्ली दंगलीतील कपील मिश्रा, मंत्री अनुराग ठाकूर किंवा खासदार परवेश वर्मा यांना मात्र खुली सूट दिली जात आहे आणि अदखलपात्र अशा घटनांना देशद्रोहाचे रुप दिले जात आहे, ही लोकशाहीची विटंबना आहे. माजी खासदार परेश रावल यांनी टूलकिटसंदर्भात केलेल्या ट्विटबद्दल भाजपचे मत काय आहे हेदेखील समोर आले पाहिजे. अर्णब गोस्वामीविरोधातील कारवाईसंदर्भात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने पुढाकार घ्यावा, या मागणीचा पुनरुच्चारही सावंत यांनी केला.

Exit mobile version