Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकारने वारकर्‍यांची माफी मागावी ! : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने वारकर्‍यांवर पोलिसांच्या माध्यमातून अमानुष अत्याचार केले असून यासाठी माफी मागावी अशी मागणी आज खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

 

काल पोलिसांनी वारकर्‍यांवर लाठीमार केल्यानंतर वातावरण तापले आहे. गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाने लाठीमार झाला नसून फक्त वारकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे म्हटले असले तरी अनेक व्हायरल व्हिडीओजमध्य लाठीमार झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टिका केली.

 

खासदार संजय राऊत आज म्हणाले की, सरकारने आधी वारकर्‍यांची आणि महाराष्ट्राची माफी मागायला हवी. वारकर्‍यांची संस्कृती हि महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे माफी मागितल्याशिवाय तुम्ही पंढरपूरमध्ये पाय ठेऊ नका. ज्याप्रमाणे कालचे चित्र होते ते पाहता पोलिसांमध्ये औरंगजेब संचारला होता. ‘महाराष्ट्रात औरंग्याची अवलाद कशी निर्माण झाली?’ असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो. आम्ही ती काल पहिली तीही तुमच्याच राजवटीत. याला पूर्णपणे भाजपच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.

 

दरम्यान, खासदार राऊत पुढे म्हणाले की, कालच्या निर्घृण हल्ल्यात वारकर्‍यांची पळापळ झाली आणि ते जखमी झाले, ही सत्तेची मस्ती आहे. भाजप आता प्रत्येक ठिकाणी आपली राजकीय मस्ती दाखवायला लागला आहे. त्र्यंबकेश्वर, जळगाव, नगर आणि संगमनेर अशा प्रत्येक ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि वातावरण तापवायचं, हे काम भाजप करत आहे. यासाठी त्यांनी टोळ्या पाळल्या आहेत. त्या टोळ्या तिथे घुसतात आणि धार्मिक तणाव निर्माण करतात. वारकर्‍यांवरील हल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत निर्घृण प्रकार आहे. या हल्ल्याचं प्रायश्चित्त कोण घेणार? कुठे आहेत तुमचे धर्माभिमानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? हिंदुत्वाचा आक्रोश करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे लोकं कुठे आहेत? वारकर्‍यांवरील हल्ला हा हिंदुत्वावरील हल्ला नाही का? आता हिम्मत असेल तर सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढा असा सल्ला त्यांनी दिला.

Exit mobile version