मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसेच्या सभेला परवानगी देण्याचा वा नाकारण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार नाही . कोणत्याही मेळावा अथवा सभेला परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार तेथील पोलीस आयुक्तांचा असल्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.
औरंगाबादमध्ये १ मे महराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आहे. प्रशासनाकडून ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. सर्व पक्षीय बैठकीत भोंगा आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात सर्व चर्चा करण्यात आली आहे. मनसेच्या सभेसंदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार नाही. जाहीर सभा घेण्यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा हा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अधिकार आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि पोलीस महासंचालकांसोबत चर्चा केल्यानंतर तसेच परिस्थिती पाहूनच पोलीस आयुक्त निर्णय घेतील. मात्र कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर राज्य सरकार कारवाई करेल, असा इशाराही ना. दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिला आहे.