जळगाव, प्रतिनिधी । शहरात दिवसेंदिवस अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत असून यातच महापालिकेतील सफाई कामगारांनी त्यांना येणाऱ्या अडचणींचा पाढा मनपा प्रशासनाकडे वाचला.
मागील काही दिवसांपासून सफाई मक्तेदाराने काम बंद केल्यामुळे महापालिकेच्या कायम ४४० कर्मचार्यांकडून शहरात स्वच्छता केली जात आहे. दरम्यान, कामगार उशिरा आल्याने त्यादिवशी त्याची दांडी लावण्यात येत आहे. ते उशिराने आल्याने त्यांच्याकडून अधिकचे काम करुन घेण्यात येत आहे. यातच वार्डातील नगरसेवकांकडून सफाई कर्मचार्यांशी अरेरावी केली जात असून यातून कर्मचार्यांना काम एकप्रकारे शोषण होत असल्याचा आरोप सोमवारी कर्मचार्यांकडून करण्यात आला. दरम्यान, कर्मचार्यांनी त्यांनी समस्येबाबत तोंडी तक्रार दिली असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांनी सांगितले. महापौर भारती सोनवणे यांनी सफाई कर्मचार्यांबाबत सोमवारी भ्रमणध्वनीद्वारे माहिती जाणून घेतली.