Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना डिवचले

 

नाशिक : वृत्तसंस्था । वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय..” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उद्देशून म्हटलं आहे, ते नाशिक येथे पत्रपरिषदेत बोलत होते.

 

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला होता. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

“आपण महाराष्ट्रातील राजकारणी आहोत, एक संस्कृती आहे. शुभप्रसंगी आपण नेहमी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा देत असतो. हा संस्कार महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे या प्रत्येक प्रमुख नेत्याने राजकीय कार्यकर्त्यांवर केलेला आहे. हे काही शत्रूत्व टोकाचं नसतं. ही काय चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची लढाई नाही. राजकारणात मतभेद असतात, पण त्यांच्या घरात एखादा मंगलप्रसंग असेल तर आपण त्यांना शुभेच्छा देतच असतो ना? यामध्ये राजकारणचा काय प्रश्न? मी असं म्हणालो की चंद्रकांत पाटील हे एक निरागस, निष्पाप व निषकपट व्यक्तिमत्व आहे. लहान मुलासारखं त्याचं मन आहे, अशा व्यक्तीला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत, त्यांचा जन्मदिवस आहे ” असं संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

 

पक्ष संघटनेला गती देणं गरजेचं आहे. मागील साधारण दीड-पावने दोन वर्षांपासून राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. ते सरकारचं काम करत असताना, ज्या पक्षाने आपल्याला ही सत्ता मिळवून दिलेली आहे. त्या पक्षाची बांधणी करणं हे आमच्या सारख्या नेत्याचं कर्तव्य आहे. त्यासाठी जिल्ह्यात तालुक्यातील शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना भेटणं, त्यांना समजून घेणं. आगामी काळात आपल्याला काय करायचं आहे? कोणत्या दिशेने जायचं आहे? याबाबत त्यांना स्पष्ट मार्गदर्शन करणं. कारण, सध्या थोडी गोंधळाची स्थिती दिसत आहे व ती प्रसिद्धी माध्यमातून निर्माण होताना दिसत आहे. मात्र असा कोणताही गोंधळ नसल्याने, शिवसैनिकांमध्ये कोणताही गोंधळ राहू नये व संघटनेला त्यातून गती मिळावी यासाठी हा दौरा होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा दौरा सुरू झालेला आहे.” अशी माहिती देखील यावेळी संजय राऊत यांनी दिली.

 

“महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष करून शिवसेनेच्या मुंबई व कोकणाच्या बरोबरीने नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचं योगदान हे नेहमी महत्वाचं आहे आणि उद्याच्या निवडणुकीत मग त्या महागरपालिका, जिल्हा परिषदा खास करून आगामी विधानसभा निवडणुका त्यावेळी देखील ही सत्ता आपल्याला मागच्या पानावरून पुढे न्यायची असेल, तरी देखील उत्तर महाराष्ट्राची साथ ही लागेल, या भावनेतून उत्तर महाराष्ट्रात संघटनेबाबत कार्य सुरू आहे. जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये शिवसैनिकांचा व जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिवसैनिक वाट पाहात होते, अनेक ठिकाणी रस्त्यांवर लोक उभे होते. प्रत्येकाचे प्रश्न आहेत, सत्ता जरी आपली असली तरी प्रश्न कायम असतात. शिवसैनिकांच्या काही प्रश्नांसदर्भात काही भूमिका घेणं गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि याबाबत मी मुंबईला गेल्यावर पक्ष प्रमुखांशी चर्चा करणार आहे..” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं

 

“पक्षात कायम बदल होत असतात, या क्षणी जी घडी बसवलेली आहे. ती फार बदलण्याची मला गरज वाटत नाही. कारण साधारण दीड वर्षात पक्षाचे सगळेच प्रमुख पदाधिकारी हे सरकारच्या बरोबरीने ठिकठिकाणी कोविड संदर्भात सामाजिक कार्य करत होते, लढा देत होते आणि प्रत्येकजण आपल्या कामात पुढे होता. त्यांनी संघटनेच्या कामात फार लक्ष घातलं नाही, कारण कोविड ही महामारीच अशी होती. की समाजासाठी पुढे येऊन काम करणं, ही प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम केलेलं आहे. नाशिकमध्ये देखील आपण पाहिलं असेल, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी अगदी व्यक्तिगत स्वरुपात इथं काम करत होते. प्रत्येकाने आपल्या भागात काम केलं आहे. आता हळूहळू संघटनेच्या कामात लक्ष घालणं गरजेचं आहे, त्यासाठी मी या भागात फिरलो. पंधरा दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात मी होतो.” असं या प्रश्नावर संजय राऊत यांनी उत्त दिलं.

 

Exit mobile version