Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाॅर्ट सर्किटळे लोंढरी येथे गुरांच्या गोठ्याला आग ; ८ लाखांचे नुकसान

 

पहूर , ता . जामनेर  : प्रतिनिधी । लोंढरी येथे गुरुवारी मध्यरात्री गुरांच्या गोठ्यास शॉटसर्किटमुळे  लागलेल्या भीषण  आगीत ८ लाखांची हानी  झाली आहे. जिवापाड जपलेले पशुधन डोळ्यादेखत  जळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लोंढरी  येथील शेतकरी अरूण पडोळ, शिवराम पडोळ, दिपक पडोळ, सुधाकर भागवत यांच्या गोठ्यामध्ये नेहमीप्रमाणे गाई -गुरे -म्हशी बांधलेले होते . ४ मार्चच्या मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली . या आगीमध्ये  एका गायीसह म्हशीची २ पारडू जळून भस्मासाथ  झाले २ म्हशी अंध झाल्या असून सुमारे १३ गुरे आगीमुळे होरपळली आहेत . या यागीत मानवी जीवीताची हानी झालेली नसली तरी शेतकऱ्यांचे ८ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे .

 

खळ्यात साठवलेले अन्नधान्य , नवीन ५ क्विंटल गव्हाची पोती, २ क्विंटल तूर  ,चारा . पशुखाद्य , कुट्टी , लाकडी  कृषी अवजारे ,  टोमॅटोचे कॅरेट , ढेप पोते , ठिबक नळ्यांचे बंडले यासह होते नव्हते  सर्वच या भीषण  आगीत  जळून  भस्म झाले.

 

गावकरी मोठ्या संख्येने आगीच्या दिशेने धावले . मध्यरात्री तरूणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . सर्व जण आपापल्या परीने हंडा -बादलीच्या साहय्याने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते .

 

पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ , बीट हवलदार शशिकांत पाटील आदी घटनास्थळी तातडीने दाखल झाले . पहाटे पर्यंत धुराचे लोट सुरू होते .पोलीस निरीक्षक सहकाऱ्यांसोबत तीन तास ठाण मांडून होते . जामनेर नगर परिषदेच्या  अग्नीशामन दलासही  पाचारण करण्यात आले . अग्नीशमन दलाच्या २  गाड्या आल्या खऱ्या , परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . अखेर  अग्नीशमक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले .

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . राठोड , जामनेरचे कृषी वैद्यकिय अधिकारी , तसेच पहुरचे तायडे यांनीही गुरांवर उपचार केले . प्रचंड भितीदायक वातावरण होते . शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरे जात आहेत . त्यातच अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . या घटनेमुळे सर्वत्र  हळहळ व्यक्त होत आहे .

 

आता आग शमली असली तरी जखमी झालेली जनावरे मरण यातनांनी विव्हळत आहेत . जीवापाड जपलेल्या गाई – गुरांना डोळ्या देखत जळतांना पाहून शेतकऱ्यांचे हृदय हेलावून गेले . आगीच्या जबड्यातून गुरांना काढण्यासाठी गावकरी सरसावले होते .

 

आज सकाळी तलाठी स्वाती बांगर यांनी पंचनामा केला .यावेळी सरपंच राजमल भागवत, पोलीस पाटील संगीताबाई  चिकटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .घटनास्थळी जिल्हा परिषद    सदस्य प्रमिलाबाई पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली .

 

शेतकरी अरुण पडोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ..या संकटातून सावरण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे .

Exit mobile version