Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीज वितरणाची प्रलंबित कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । रब्बीचा हंगाम सुरु होत असल्याने या काळात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा याकरीता मंजूर करण्यात आलेली कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करुन वेळेवर व पुरेशी वीज उपलब्ध करुन देण्याचे आदेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील उर्जा विभागाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार श्रीमती लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, अधिक्षक अभियंता शेख, धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद ननावरे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील नागरीकांना व शेतकऱ्यांना वीजेचा सुरळीत पुरवठा व्हावा, याकरीता जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2019-20 या आर्थिक वर्षात 16 कोटी 73 लक्ष निधीस प्रशासकीय मान्यता दिली असून 14 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यात 194 कामे सुरु आहे. तर अनेक कामे पूर्ण झाली आहे. प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले वीज कनेक्शन, तसेच शेतीला पाणी देण्यासाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर वेळेत देण्याची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना दिल्यात. तसेच येत्या 12 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांच्यावेळी लोडशेंडीग होणार नाही याबाबात दक्ष राहण्याच्याही सुचना त्यांनी दिल्यात. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे ऑईल खरेदीसाठी मागील वर्षी 75 लाख रुपयांचा निधी नाविन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून दिला होता. यावर्षी कोविडमुळे निधी नसल्याने या खर्चासाठी सर्व आमदारांच्या निधीतून 1 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे सांगून स्वतःच्या निधीतून 20 लाख रूपये देत असल्याचे पालकमंत्री यांनी बैठकीत सांगितले.

जळगाव विद्युत मंडळ कार्यालयाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव नव्याने सादर करावा, वीजेचा धक्का लागून मृत्यु झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मदत देण्यात यावी, तसेच उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्याचा उपचाराच्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळावी आदि विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला त्याचबरोबर जळगाव तालुक्यातील चिंचोली, मोहाडी, नशिराबाद, सुनसगाव, जामनेर तालुक्यातील देऊळगाव, वाकोद, पाळधी, तोंडापूर, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, नायगाव व दुई, पाचारो तालुक्यातील सावखेडा, पारोळा तालुक्यातील बहादरपूरम, यावल तालुक्यातील साखळी, डांभूर्णी येथील उपकेंद्रांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात येऊन नव्याने 16 कामांचा नवीन डीएसआरप्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व संबंधितांना दिल्यात.

Exit mobile version