जळगाव, प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार म्हणजेच ज्ञानाचा विचार विद्यार्थ्यात आणि समाज मनात रुजविणे होय असे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
काव्य रत्नावली चौकात आयोजित अभिवादन सभेत मुकुंद सपकाळे यांनी नामांतर आंदोलनाचा इतिहास सांगताना. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी राज्यभरात अनेक वर्ष मोठा लढा द्यावा लागला. या आंदोलनात पोचीराम कांबळे, सुहासिनी बनसोडे ,गौतम वाघमारे, दिलीप रामटेके आदी आंदोलनकर्ते जातीयवाद्यांचे बळी ठरून शहीद झाले होते. अखेर राज्य शासनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद असा नामविस्तार १४ जानेवारी १९९४ रोजी करावा लागला. अशी माहिती दिली.
यावेळी डॉ.मिलिंद बागुल याप्रसंगी बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यापीठाला नाव असण म्हणजेच विद्यापीठामध्ये, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या त्या पिढीला ज्ञानाच्या आदर्शाची जाणीव होणं होय हे खऱ्या अर्थाने लक्षात घेण्याची गरज होती असे मत त्यांनी व्यक्त केले. बापूराव पानपाटील यांनी नामांतर आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले. हरिश्चंद्र सोनवणे आपल्या मनोगतात भारतीय लोकशाहीत मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार हा एक क्षण असल्याचे मांडले. रमेश सोनवणे,जगदीश सपकाळे,संजय सपकाळे यांनी देखील आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले. सूत्रसंचालन भारत ससाणे यांनी केले.तर आभार अमोल कोल्हे यांनी मानले. यावेळी नगरसेवक सुरेश सोनवणे, दिलीप सपकाळे, माजी नगरसेवक राजू मोरे, चंदन बिऱ्हाडे, प्रशांत साळुंके, भानुदास गायकवाड, दिलीप त्र्यंबक सपकाळे, भीमराव अडकमोल, महेंद्र केदार, भारत सोनवणे, टी. एच.भालेराव, समीर सोनवणे, दिलीप जाधव, पितांबर अहिरे, गौतम सपकाळे,राजू सोनवणे, संदीप सोनवणे, मिलिंद तायडे, प्रफुल्ल वानखेडे, सचिन अडकमोल,अनुप पानपाटील, खंडू महाले संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.