लालकृष्ण अडवाणींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

लखनऊ वृत्तसंस्था । बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी येत्या ३० सप्टेंबरला लखनऊचे विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. न्यायाधीश एस.के.यादव यांनी निकालाच्या दिवशी लालकृष्ण आडवाणींसह सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. निकाल देण्यासाठी मागच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली होती.

या खटल्यात एकूण ३२ आरोपी आहेत. यात तत्कालीन उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा हे आरोपी आहेत. सहा डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी अयोध्येत मशीद पाडली होती. त्यावेळी लालकृष्ण आडवणी, मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे वरिष्ठ नेते राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

“बचाव आणि अभियोग पक्षाचा युक्तीवाद एक सप्टेंबर रोजी संपला. त्यानंतर या खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी निकाल लिहायला सुरुवात केली. सीबीआयने न्यायालयासमोर ३५१ साक्षीदार आणि पुरावा म्हणून ६०० कागदपत्रे सादर केली” अशी माहिती सीबीआयचे वकिल ललित सिंह यांनी दिली.

आडवाणी-जोशींशिवाय विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि मशीद पाडणाऱ्या कार सेवकांविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला होता. एकदा या खटल्यात आडवणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टासमोर हजर झाले व आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. राजकीय कारस्थानातंर्गत आडवाणी यांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्यांच्याविरोधातील सर्व पुरावे चुकीचे आहेत असे आडवाणी यांचे वकिल के.के.मिश्रा यांनी म्हटले आहे.

Protected Content