लडाखनंतर आता चीनची नजर उत्तराखंडच्या सीमेवर?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । एका वर्षापासून अधिक काळ लडाखमध्ये भारतासोबत सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी लष्कराने उत्तराखंडजवळच्या बाराहोटी क्षेत्रामधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ  हालचाली वाढवल्याचं चित्र आहे. 

चीनच्या या कुरापतींमुळे भारतही सज्ज झालेला आहे. नुकतीच या ठिकाणी चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीमधील  जवानांची एक तुकडी सक्रीय असल्याचं दिसून आलं. सुत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, “नुकतेच येथे पीएलएचे ३५ सैनिकांची एक तुकडी नजरेस पडली. ही तुकडी उत्तराखंडमधील बाराहोटी परिसराच्या आसपास सर्वेक्षण करताना दिसून आली.” चीनच्या बाजूच्या प्रदेशामध्ये काहीजण दिसून आल्याचेही यावेळी सांगण्यात आलं आहे. चिनी सैनिक या ठिकाणी सर्वेक्षण करत असल्याचं दिसून आलं आहे.

  भारताने या सीमाभागामध्ये पूर्ण तयारी केलेली आहे. सुरक्षा व्यवस्था आणि  काही दिवसांपासून या भागात चिनी सैनिकांचा वाढती हलचाल पाहून याठिकाणी काहीतरी करण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट होत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी भारतीय सैन्य आणि भारताची एकंदरित तयारी मजबूत असल्याने चीनला काही कुरापती करता येणार नसल्याचं सांगण्यात आलंय. चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत आणि केंद्रीय सेना प्रमुख लेफ्टनंट जनरल व्हाय डिमरी यांनी नुकताच या ठिकाणी पहाणी दौरा केला. येथील  परिस्थिती आणि एकंदरित कारभाराचा सर्व समीक्षा त्यांनी केलीय.

 बाराहोटी परिसराजवळ एका एअर बेसवर चिनी लष्कराच्या हलचाली वाढल्याचं दिसत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने ड्रोन तैनात करण्यात आल्याचही भारतीय सुत्रांनी स्पष्ट केलं आहे.  भारताने केंद्रीय क्षेत्रामध्ये अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. भारताने नौदलालाही या परिसराच्या आसपासच्या काही एअर बेसवर सक्रीय केलं आहे.

गेल्या वर्षापासून लडाख सीमेबरोबरच उत्तराखंड आणि अरुणाचलमध्ये सुरु असलेल्या चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भारताने किमान ५०,००० अतिरिक्त सैनिक काही आठवड्यांपूर्वी भारत-चीन सीमेवर तैनात केले आहे. उत्तराखंड, लडाख आणि अरुणाचल असा चीनला लागून असणाऱ्या तीन सीमांवर हे लष्कर तैनात करण्यात आलंय. गेल्या काही महिन्यांत चीनच्या सीमेजवळील तीन वेगवेगळ्या भागात भारताने सैन्य आणि फायटर विमाने तैनात करण्यात आली आहेत. सध्या चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन लाखांच्या वर सैन्य सीमेवर तैनात करण्यात आलं आहे. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी अधिक आहे. भारतीय हवाई दलाची विमानेही सीमेवर सज्ज  आहेत. ही लढाऊ विमाने चीनला लागून असलेल्या तीन भागांमध्ये तैनात आहेत.

१९६२ मध्ये भारत आणि चीन यांच्यात दोन युद्धे झाली होती. १९७४ पासून काश्मिर हा दोन्ही देशांमधील अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने भारताने धोरणात्मक दृष्टिकोनातून पाकिस्तानला अधिक महत्त्व दिले. गेल्या वर्षी १५ जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबतचे प्रकरण शांत ठेवत चीनच्या सीमेवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण अवलंबिले  

यापूर्वीही सीमेवर चिनी अतिक्रमण रोखण्यासाठी भारताने सैन्य तैनात केले होते, पण आता सैन्यात वाढ करून आक्रमण रोखण्याची आणि चीनच्या सीमेत प्रवेश करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. भारत यापुढे चीनविरूद्ध आक्रमक संरक्षण धोरण अवलंबण्यास मागेपुढे पाहणार नाही असे सूत्रांनी म्हटले आहे.

जून २०२० मध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीतील चिनी सैन्यासह झालेल्या संघर्षानंतर सीमेवर अद्याप शांतता नाही. दोन्ही देशांचे सैन्य अजूनही एकमेकांसमोर उभे आहेत. पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच चीनकडून कुरापती सुरुच आहे. चीनने पूर्व लडाखमधील सीमा भागात सैन्याच्या कारवाया वाढवल्या आहेत. या भागात चीनने युद्धसराव सुरु केला आहे. तरी, चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे.

पूर्व लडाखमधील सध्याची परिस्थिती दीर्घकाळ कायम राहण्याचा द्विपक्षीय संबंधांवर ‘नकारात्मक रीतीने’ परिणाम होत असल्याचे भारताने चीनला ठामपणे कळवल्यानंतर, वाटाघाटींच्या माध्यमातून ‘तातडीचा उपाय’ शोधणे आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर परस्परमान्य तोडगा काढण्यास आपण तयार आहोत असे चीनने १५ जुलै रोजी सांगितले. ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या  परिषदेच्या निमित्ताने भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची १४ जुलै रोजी तासभर प्रत्यक्ष चर्चा झाली. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा एकतर्फी बदल भारताला मान्य नसून, पूर्व लडाखमध्ये संपूर्ण शांतता व स्थैर्य प्रस्थापित झाल्यानंतरच दोन्ही देशांमध्ये सामान्य संबंध विकसित होऊ शकतात, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे चिनी समपदस्थ वांग यी यांना सांगितले होते. वांग यांच्या जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबतचे निवेदन चीनच्या परराष्ट्र  मंत्रालयाने १५ जुलै रोजी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. भारत व चीन यांच्यातील संबंध सध्या घसरलेले असून; गलवान खोरे आणि पँगाँग सरोवर येथून सैन्य माघारी घेण्यात आल्यानंतर सीमेवरील परिस्थिती ‘सामान्यपणे निवळत आहे’, असे यात म्हटले आहे.

 

Protected Content