Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वे थांब्याच्या मागणीसाठी कृती समितीचे धरणे आंदोलनाचे आयोजन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ – मुंबई पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी यासह इतर रेल्वे गाड्यांना पाचोरा येथे थांबा मिळावा या मागणीसाठी गुरूवारी २० ऑक्टोबर रोजी पाचोरा प्रवाशी रेल्वे कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना काळात विस्कळीत झालेल्या रेल्वे वेळा पत्रकाने पाचोरा, भडगाव, जामनेर, सोयगाव, एरंडोल या तालुक्यातील नागरिकांना व प्रवाशांना पराकोटीचा त्रास होत आहे. विद्यार्थी व्यापारी नौकरदार, गोरगरीब जनता यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. त्यामुळे पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीने लोक भावना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनात जाग आणण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. संध्याकाळी ७ वाजेनंतर पाचोरा येथून मुंबईला जाण्यासाठी कोणतीच गाडी नसल्याने विदर्भ एक्सप्रेस व पंजाब मेल या गाड्यांना पाचोरा येथे थांबा तसेच भुसावळ – मुंबई पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी पाचोरा रेल्वे स्टेशन येथे पाचोरा प्रवासी रेल्वे कृती समितीतर्फे २० ऑक्टोबर २०२२ गुरुवार रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

सदर मागण्यासाठी रेल्वे प्रशासनाला कृती समितीतर्फे अनेक निवेदन दिली आहेत. परंतु रेल्वे प्रशासन त्याची दखल घ्यायला तयार नाही वरील मागण्यासाठी पाचोरा प्रवासी कृती समितीतर्फे धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात विद्यार्थी, व्यापारी, प्रवासी, रिक्षा युनियन व गोरगरीब जनता सहभागी होणार आहे. तरी या आंदोलनात समविचारी लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, विलास जोशी, अॅड. अविनाश भालेराव, भरत खंडेलवाल, सुनील शिंदे, नंदकुमार सोनार, अॅड. अण्णासाहेब भोईटे, पप्पू राजपूत, प्रा. मनोज बाविस्कर, शेबाज बागवान, प्रा. गणेश पाटील, संजय जडे, निलेश कोटेचा, बंडू मोरे, अनिल (आबा) येवले यांनी केले आहे.

Exit mobile version