रावेरमध्ये सात दिवसांचा जनता कर्फ्यू : नगरपालिकेच्या मागणीवर प्रशासनाचा निर्णय

रावेर प्रतिनिधी । येथे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता १३ जुलैपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात यावा अशी मागणी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली असून याला तहसीलदारांनी मान्यता दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असून शहरात देखील रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. यामुळे जसा अन्य शहरांमध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आलाय. अगदी त्याच प्रकारे रावेर शहरात सुध्दा १३ जुलैपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा अशी मागणी आज रावेर नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आज तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना देण्यात आले. या निवेदनावर नगराध्यक्ष दारा मोहंमद व उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्यासह नगरसेवक आसीफ मोहंमद दारा मोहंमद, सूरज चौधरी, शेख सादीक अब्दुल नबी, असदुल्लाखा मेहबूबखा, शरदाबाई चौधरी, पार्वताबाई गणपत शिंदे, संगीता भास्कर महाजन, यशवंत दलाल, संगीता वाणी, हमीदाबी अय्यूबखा पठाण, ललीता बर्वे, शेख नुसरत यास्मीन कलीम, रंजना योगेश गजरे आणि संगीता अग्रवाल यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

याप्रसंगी मुख्याधिकारी रवींद्र लांडे व सपोनि शीतलकुमार नाईक यांची उपस्थिती होती. दरम्यान, या निवेदनाबाबत तहसीलदारांनी सकारात्मक निर्णय घेतला असल्याने आता रावेरात जनता कर्फ्यू लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content