राज्य सरकार महिलांप्रती असंवेदनशील : महिला आयोगाचे ताशेरे

मुंबई प्रतिनिधी | देशात सर्वत्र महिला आयोग असतांना राज्यात दोन वर्षांपासून आयोग नसल्याची बाब लाजीरवाणी असून सरकार महिलांप्रती असंवेदनशील असल्याचे ताशेरे आज केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी ओढले. साकीनाकी येथील मयत पिडीतीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर हे सदस्य पत्रकारांशी बोलत होते.

 

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथकं मुंबईत दाखल झालं आहे. महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यानंतर पत्रकारांशी बोलतांना सदस्य म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली आहे. पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली आहे. तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल.

 

दरम्यान, साकीनाका येथील घटना ही दुर्देवी असून आरोपींना कोणाची भीती नाही आहे. आरोपींच्या मनात भीती असती तर त्या रात्री अशी घटना घडली नसती. गेल्या काही दिवसांपासून अनेक घटनांची माहिती घेतली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आठवडाभरात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामागे राज्यशासनाचा निष्काळजीपणा आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत. संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील.  सरकार इतकं असंवेदनशील कसं आहे की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. जर ते असतं तर महिलांना न्याय मिळाला असतं अशी टीका याप्रसंगी करण्यात आली.

Protected Content