Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्य सरकारलाच दंगली घडवायच्या आहेत : जितेंद्र आव्हाड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणुकीतील पराभवापासून वाचण्यासाठी राज्य सरकारलाच दंगली हव्या आहेत असा गंभीर आरोप माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

 

राज्यात अकोला आणि छत्रपती संभाजी नगरच्या पाठोपाठ अहमदनगर आणि आता कोल्हापूरमध्ये जातीय संघर्ष झाला आहे. यावर भाष्य करतांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवरच आरोप केला आहे.

 

या संदर्भात ते म्हणाले की, मी तीन महिन्यांपूर्वी बोललो होतो. महाराष्ट्रात वारंवार दंगली घडवल्या जातील. जे चांगलं चाललं आहे त्यात वातावरण बिघडवण्याचं काम केलं जाईल. शासनाला काहीही करुन दंगली हव्या आहेत. महाराष्ट्राचं वातावरण इतकं खराब आहे की आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडीला २०० जागा मिळतील. त्यामुळेच निवडणूक होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत वातावरण बिघडवून टाका, खराब करुन टाका असं या सरकारचा प्रयत्न आहे. असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

 

आपल्या या आरोपाबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी आधीच दोन महिन्यांपूर्वी ट्विट करून राज्यात भयंकर दंगली घडविण्याचा कट रचला जात असल्याचे म्हटले होते. यानुसार, दंगली घडत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

Exit mobile version