राज्यातील सरकार पाडणे हा ओघाने येणारा हेतू , मुख्य नव्हे — फडणवीस

 

मुंबई : वृत्तसंस्था । अजेंड्यावर काम करताना सरकार पाडणं आमचं बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

 

आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही असं सांगत त्यांनी सरकार पाडण्याच्या प्रश्नावर उत्तर देत आपली बाजू मांडली.

 

सरकार पडणं हा तुमच्या प्रतिक्षेचा भाग असायला हवा का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. केवळं भजनं म्हणण्यासाठी आम्ही येथे आलेलो नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावं लागेलं. आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही”.

 

 

 

पुढे ते म्हणाले की, “मी पाच वर्ष मुख्यमंत्री होतो तेव्हा पहिलं वर्ष वगळत चारही वर्ष आम्ही गुजरातच्या पुढे गेलो. गुंतवणुकीत आम्ही गुजरातला इतकं मागे टाकलं की गुजरातसहित तीन प्रमुख राज्यांची जितकी गुंतवणूक व्हायची त्यापेक्षा जास्त आम्ही महाराष्ट्रात आणत होते. आता जे सरकार आलं आहे या सरकारमध्ये गुजरात १० टक्के पुढे गेलं पण कोणी काहीच बोलत नाही. आमच्या काळात किती आंकांडतांडव करायचे सर्वजण. पण आता कोणी त्याच्यावर प्रश्न विचारण्यास तयार नाही”.

 

“सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आमचा अजेंडा ठरलेला आहे. आमच्या अजेंड्यावर आम्ही करत आहोत. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणं आमचं बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.

 

“आत्ताचं सरकार आहे त्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक लोक मुख्यमंत्र्यांची आधीच जाहीर करतात. मीदेखील पाच वर्ष मुख्यमंत्री होतो. त्याचे काही संकेत असतात. महत्वाचे धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचे असतात आणि मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याला नेमतात त्यांनी ते जाहीर करायचं असतं. कारण त्याचे परिणामही तसे अपेक्षित असतात. या सरकारमध्ये कितीही महत्वाचे निर्णय असो ज्याच्या मनात येईल तो निर्णय जाहीर करतो,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

 

“कॅबिनेटमध्ये धोरणात्मक निर्णयांची चर्चा होते. ती चर्चा प्रत्येकजण ऐकतो. चर्चा ऐकल्यानंतर हा निर्णय मला कसा लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्याचं श्रेय घेता येईल हे सर्व होताना दिसत आहे. त्यातूनच कालचा प्रकार घडला आहे. यामुळे लोकांचा फार भ्रमनिरास होते. लोक आता चातकासारखे डोळे लावून आहेत. सुरु आहे सांगायचं आणि नंतर बंद आहे असं स्पष्टीकरण देणं लोकांना त्रास देणारं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांवर चाप ठेवला पाहिजे. मंत्र्यांनीही रोज बाहेर येऊन मुख्यमंत्री काय निर्णय जाहीर करणार आहेत सांगायचं आणि उद्या मुख्यमंत्री जाहीर करणार सांगायचं…मग तुम्ही कशाला  पाहिजे. हे बंद झालं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

 

Protected Content