Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

येत्या १ मेपर्यंत महामार्गाची समृद्धी !

 

 

अमरावतीः वृत्तसंस्था । ‘येत्या १ मे पर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अमरावतीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली..

‘मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून १ मे पर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ‘जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान असेल,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.

 

‘लॉकडाऊनच्या काळात महामार्गाच्या कामात कुठे तरी अडचण येईल किंवा खंड पडेल असं वाटलं होतं. पण कोरोना काळातही महामार्गाचं काम थांबलेलं नाही. येत्या १ मेपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करु शकतो. १ मेपर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ. त्याच्या पुढच्या १ मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेले असू,’ असं ठाम अश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

 

समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणार आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होताच नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर अवघ्या ८ तासांत पूर्ण करता येणार आहे.

समृद्धी महामार्गावर दर ४० ते ५० किमी मार्गावर दोन्ही बाजूला वेसाइड ऍमेनिटीजची उभारणी करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच महामार्गावर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून वाहनांचा वेग, लेन कटिंग, वाहन ब्रेकडाऊन होणे इत्यादींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Exit mobile version