Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी सोमवारी राज्यसभेत शेतकरी आंदोलनाबद्दल बोलण्याची शक्यता

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा समाप्त झाली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सदनात या चर्चेला उत्तर देऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून खासदारांना व्हिप जारी करण्यात आलं आहे.

दुसरीकडे लोकसभेत मात्र आजही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होऊ शकली नाही. प्रश्नोत्तराच्या तासात कोरोना लसीकरणासंबंधी प्रश्नांवर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिलं. लोकसभेतील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदी यांनी संसद भवनात सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

सहारनपूरचे खासदार हाजी फजलुर्रहमान यांनी संसदेत कृषी कायद्याला विरोध दर्शवला. त्यासाठी त्यांनी हातात एक पोस्टर घेतलं होतं. त्या पोस्टरवर ‘तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, शेतकऱ्यांचा जीव वाचवा’ असं लिहिण्यात आलं होतं. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजही लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला. कृषी कायद्याविरोधात विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली.

शिरोमणी अकाली दलाचे खासदार सरदार बलविंदर सिंह भुंदर यांनी कृषी कायद्यात नेमकं काळं काय? याचं उत्तर दिलं आहे. सरकार सांगत आहे की, आत्मनिर्भर भारत बनवू, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु, हे कसं होणार तर त्यासाठी कृषी प्रणालीचं आधुनिकीकरण करण्याबाबत सांगण्यात आलं आहे. देशात १ ते ५ एकरवाले जवळपास ८० टक्के शेतकरी आहेत. हाच आकडा ७ एकरपर्यंत नेल्यास ९० टक्के होतो. सरकारनं आडतीसह ओपन मार्केट दिलं. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग दिलं. जेव्हा कृषी क्षेत्रात मोठ्या कंपन्या पाऊल ठेवतील तेव्हा दोन एकर शेती असलेल्या शेतकरी त्यांच्याशी सामना कसा करणार? काही वर्षानंतर जेव्हा त्यांची मोनोपॉली तयार होईल, बियाणं त्यांचं असेल, खत त्यांचं असेल, किमतीवर नियंत्रणही त्यांचंच असेल. काही वर्षात शेतकरी कर्जबाजारी होईल आणि कंपन्या त्यांच्या जमिनी हडप करतील’. अशी भीती सरदार बलविंदर सिंह भुंदर यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७२ वा दिवस आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेलेलं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. या ठिकाणाहून अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपणं फुलं लावणार आहोत आणि त्यासाठी २ ट्रक माती मागवल्याचंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version