Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी सरकारने शरियतमध्ये हस्तक्षेप केल्याने कोरोना, चक्रीवादळांसारखी संकटं !

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशमधील मुरादाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी कोरोना आणि चक्रीवादळांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरत भाजपाने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने या आपत्ती आल्याचं म्हटलं आहे.

 

हसन यांनी सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि एनआरसी (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) कायद्यांच्या माध्यमातून मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केलाय. सात वर्षांमध्ये मोदी सरकारने केवळ धार्मिक भेदभाव निर्माण करण्यासंदर्भातील कायदे बनवले. सरकारच्या या भेदभावामुळेच महासाथ आणि दोनदा वादळं येऊन गेली आहेत. जमीनीवरील लोकांनी न्याय दिला नाही तर  ईश्वरी शक्ती न्याय करते, असंही हसन यांनी म्हटलं आहे.

 

“देशातील ९९ टक्के लोक धार्मिक आहेत. जग चालवणारा आणि जगामध्ये न्याय देणारा कोणीतरी वर आहे असं आपल्यापैकी सर्वजण मानतात. जेव्हा आकाशातील तो न्याय करतो तेव्हा त्यात जर तरची शक्यता नसते. काही दिवसांमध्ये किती मृतदेहांची कशापद्धतीने हाताळणी करण्यात आली, त्यांना मृत्यूनंतरचा सन्मान नाकारण्यात आला हे आपण पाहिलं असेल. मृतदेह नदीत सोडण्यात आले. कुत्र्यांनाही मृतदेहांचे लचके तोडले. श्मशानांमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडंही उपलब्ध नव्हती,” असं हसन यांनी म्हटलं आहे. या सरकारला गरीब जनतेची चिंता नाहीय. सर्व वाटा केवळ श्रीमंतांचा आहे, असा टोलाही हसन यांनी लगावला. ज्याने श्रीमंतांना जन्म दिलाय त्यानेच गरीबांना जन्म दिलाय. तो सर्वांचा मालक आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता माझ्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात आणखीन नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागेल, अशी भीतीही हसन यांनी बोलून दाखवली आहे.

 

Exit mobile version