Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी सरकारच्या कोरोना धोरणावर राहुल गांधींची टीका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारची कोविड रणनीती – स्टेज १ – तुघलकी लॉकडाउन लावा, स्टेज २ – थाळी वाजवा, स्टेज ३ – प्रभूगान.” अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवरच्या रणनीतीवर टीका केली आहे.

 

देशात दिवसेंदिवस  प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दररोज हजारो नवीन बाधित आढळून येत असून, रूग्णांचे मृत्यू देखील सुरूच आहे. केंद्र सरकारकडून  संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत, मात्र संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवरच्या रणनीतीवर निशाणा साधला आहे.

 

या अगोदर देखील वेळोवेळी राहुल गांधी यांनी देशात संसर्ग वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर टीका केलेली आहे.

 

“ना चाचण्या, ना रूग्णालयात बेड, ना व्हेंटिलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही. केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?” असं या अगोदर राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे. “३८५ दिवसातही लढाई जिंकता आली नाही – उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या..” असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी  आहे.” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलेली आहे.

Exit mobile version