Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदींच्या अहंकारामुळे बिघडली दिल्लीतील स्थिती : थोरातांचा आरोप

मुंबई प्रतिनिधी । दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा अहंकार कारणीभूत असल्याची टीका महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी आंदोलन कडाक्याच्या थंडीतही सुरू असताना देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. दिल्लीतील आजच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले ते अयोग्य असून हिंसेचे समर्थन करता येणार नाही. परंतु या परिस्थितीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची हटवादी, अहंकारीवृत्तीच जबाबदार असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

“चर्चेच्या दहा फेऱ्यानंतरही सरकार कोणत्याच निर्णयापर्यंत आलेले नाही. उलट या आंदोलनाला खलिस्तानी म्हणून बदनाम करण्याचे काम केले गेले. मोदी सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहिल्याने दिल्लीत आजची दुर्दैवी परिस्थिती उद्भवली. हे कायदे भांडवलदार, साठेबाजांच्या फायद्याचे आहेत. फक्त शेतकरीच नाही तर जनतेच्याही विरोधातील आहेत” असं थोरात यांनी म्हटलं आहे.

देश भुकेला असताना ज्या शेतकर्‍यांनी देशाला अन्न पुरवलं ते हे शेतकरी आहेत. थंडी, वा-यात दोन महिने आंदोलन करत आहेत. शेतकरी चर्चेने थकून जावेत असा केंद्र सरकारचा प्रयत्न दिसत असून शेतकऱ्यांचा अंत पाहिला जात आहे. ते आज वेगळ्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जाऊ नये. हिंसेने कोणतीही समस्या सुटत नाही, हा महात्मा गांधींचा देश आहे, शांततेचा मार्ग सोडू नये” असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं

Exit mobile version