मुंबई: वृत्तसंस्था । मिठाई व अन्य खाद्य पदार्थ तयार करून विकले जातात त्यावर तयार करण्याची आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख असणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश देत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मिठाई विक्रेत्यांना इशारा दिला आहे ग्राहकांनाही सावध केले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागातून या बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. जनतेला सकस खाद्यपदार्थ मिळाले पाहिजे, दिवाळी सुरक्षित साजरी व्हावी यासाठी ही पावले उचलली गेली आहेत, असेही राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले. आता दिवाळीसुद्धा प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी उत्तम दर्जाची मिठाई विकण्याचे आवाहन केले असतानाच नागपुरात भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली आहे. नागपूरमधील वाडी पोलिसांनी लाव्ह्यातील कारखान्यावर छापा टाकून ही भेसळयुक्त मिठाई जप्त केली. पोलिसांनी मेघराज मेसूसिंग राजपुरोहित याला ताब्यात घेतले आहे. मेघराज याचा मिठाई निर्मितीचा कारखाना असून तो भेसळयुक्त खवा वापरत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांना मिळाली होती. या कारवाईत पोलिसांनी भेसळयुक्त मिठाई, खवा यासह पावणे दोन लाखांचे साहित्य जप्त केले आहे.