जळगाव : प्रतिनिधी । ‘माझी वसुंधरा’ अभियानात जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जि प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बन्सोड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.
राज्याच्या पर्यावरण विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियानातंर्गत सन 2020-21 मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची 2 ऑक्टोबर, 2020 ते 31 मार्च, 2021 या कालावधीत पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ आज पर्यावरण दिनी ऑनलाईन पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, बी. ए. बोटे उपस्थित होते.
या स्पर्धेत नगरपरिषद गटात राज्यातील 222 नगरपरिषदा सहभागी होत्या. जामनेर नगरपरिषदेला तृतीय क्रमांकांचा पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार नगराध्यक्षा सौ. साधना महाजन आणि मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऑनलाईन स्वीकारला.
सर्वोत्कृष्ट नगरपंचायत गटात राज्यातील 130 नगरपंचायतींनी सहभाग घेतला होता. मुक्ताईनगर नगरपंचायतीस उत्तेजनार्थ पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार नगराध्यक्षा नजमा तडवी आणि मुख्याधिकारी समीर शेख यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वीकारला.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटात राज्यातील 291 ग्रामपंचायतीची निवड झाली होती. चिनावल, (ता. रावेर) ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार सरपंच सौ. भावना बोरोले आणि ग्रामसेवक संतोष सपकाळ यांनी स्वीकारला तर पहुरपेठ, (ता. जामनेर) ग्रामपंचायतीस उत्तेजनार्थ पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार सरपंच सौ. निता पाटील आणि ग्रामसेवक दत्तात्रय टेमकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वीकारला.
सर्वोत्कृष्ट महानगरपालिका (अमृत शहरे) या गटात राज्यातील 43 शहरे सहभागी होते. ठाणे महानगरपालिकेस प्रथम क्रमांक, नवी मुंबई महानगरपालिकेस द्वितीय क्रमांक, बृन्हमुंबई महानगरपालिकेस तृतीय क्रमांक तर पुणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका व बार्शी, ( जि. सोलापूर ) नगरपरिषदेस उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या अभियानात नाशिक विभागाने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट विभागीय आयुक्तांचा पुरस्कार नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.