जळगाव, प्रतिनिधी । पक्ष संघटनेच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न कसे सोडविता येतील याकडे मी जातीने लक्ष घालणार आहे. वार्डा वार्डात जावून महिलांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या नवनियुक्त शहर महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगला पाटील यांनी यांनी पुढे सांगितले की, महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत महिलांना तिकीट दिले जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शहरात नंबर एकवर कसा येईल यादृष्टीकोनातून काम करणार आहे. यानंतर जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी नवनियुक्त शहर महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील यांचे अभिनंदन करून सांगितले की, नाथा भाऊ आल्याने संघटनादेखील मजबूत करण्याच्या दृष्टीने तालुका दौरा आम्ही करणार आहोत. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हे देखील जिल्ह्यात येणार आहेत. भविष्यात जिल्ह्यात होऊ घातलेल्या विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक कसे निवडून येतील याबाबत विचारविमर्श करत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २२ वा वर्धापन दिनानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचा साप्ताह मनविण्यात येत आहे. यात वृक्षारोपण, रक्तदान शिबीर यासारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.