Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविकास आघाडी सरकार अनेक वर्षे चालेल — शरद पवार

 

मुंबई : वृत्तसंस्था । पाच वर्षे सरकार चालेल एवढा कद्रूपणा का करायचा? पुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल असा विश्वास शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकार सरकारने गेल्या वर्षभरात खूप चांगलं काम केलं आहे. हे सरकार किती वर्ष चालेल याबाबत आज शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. भाजपाची हातातली सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले. त्यानंतर चर्चा सुरु झाली की हे सरकार पडणार. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या सरकारने उत्तम काम केलं आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला. आता वर्षपूर्तीनंतर चिकित्सा जास्त केली जाते आहे. कारण महाराष्ट्रात झालेला हा पहिलावहिला प्रयोग आहे.असेही ते म्हणाले

कोरोनाचं संकट जगावर आलं. तरीही महाराष्ट्र थांबला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप चांगलं नेतृत्त्व केलं. खरंतर मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा त्यांना हे सगळं कसं जमेल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र त्यांना प्रशासकीय अनुभव नसला तरीही त्यांच्या चातुर्यात काहीही कमतरता नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही’ या पुस्तकाचं प्रकाशन आज करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारचे सगळे मंत्री उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

Exit mobile version