महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या १०५ जागांमध्ये शिवसेनेचे मोठे योगदान : शरद पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे १०५ आमदार जिंकण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसेनासोबत नसती तर १०५ चा आकडा ४०-५० असता, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केले आहे.

 

शरद पवार म्हणाले, शिवसेना नसती तर भाजपचे ४०-५० आमदारच असते. शिवसेना सहभागी नसती. किंवा शिवसेनेला त्यामधून वजा केले तर तो १०५ जागांचा आकडा ४०-५० च्या आसपास असता. तसेच ‘मी पुन्हा येईन’ म्हणण्यामध्ये दर्प होता. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरु नये. भाजपचे ‘आता आम्हीच’ हे लोकांना आवडले नाही. कुठल्याही लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करु शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही. इंदिरा गांधींसारख्या जनमानसात प्रचंड पाठिंबा असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा पराभव पाहावा लागला होता. अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालासुद्धा पराभव पाहायला मिळाला. याचा अर्थ असा आहे की, या देशातला सामान्य माणूस लोकशाहीच्या अधिकाऱ्याच्या संदर्भात आम्हा राजकारणातल्या लोकांपेक्षा अधिक शहाणा आहे आणि आमचं पाऊल चाकोरीच्या बाहेर टाकतोय असं दिसलं की तो आम्हालाही धडा शिकवतो. त्यामुळे कोणतीही भूमिका घेऊन बसलो की आम्हीच आम्हीच येणारच तर लोकांना ते आवडत नाही”, असंही शरद पवार म्हणाले.

Protected Content