महापौरांच्या हस्ते अंबरझरा तलावाच्या चारी साफसफाईला सुरुवात (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात पाणी येणाचा मुख्य स्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या चारीत झाडे, झुडपे वाढल्याने आणि जागोजागी गाळ असल्याने अडथळा निर्माण झाला होता. मराठी प्रतिष्ठानतर्फे तलावाच्या चारी सफाईचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

मेहरूण तलावात पाणी येण्याचा अंबरझरा तलाव हा नैसर्गिक स्रोत आहे. गेल्या काही वर्षात अंबरझरा तलावाच्या चारीत झुडपे वाढल्याने आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांनी ये-जा करण्यासाठी चारीत कच्चे रस्ते केल्याने जागोजागी पाणी अडत होते. परिणामी मेहरूण तलावात पाणी पोहचू शकत नव्हते. जळगावातील मराठी प्रतिष्ठानतर्फे अंबरझरा तलावाची चारी साफसफाई मोहिम हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. रविवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते जेसीबीला नारळ वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, मतीन पटेल आदी उपस्थित होते.

दोन दिवसात होणार अडथळा दूर
अंबरझरा तलाव ते मेहरूण तलाव दरम्यान असलेल्या चारीतील सर्व झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत आहेत. तसेच ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी कच्चे रस्ते तयार केले आहेत त्याठिकाणी सिमेंट पाईप टाकून दोन्ही बाजूला भर टाकून रस्ता केला जाणार आहे. दोन दिवसात सर्व काम पूर्ण होणार असून त्यानंतर मेहरूण तलावात पाणी येताना निर्माण झालेला अडथळा दूर होणार आहे. मराठी प्रतिष्ठान नेहमी पर्यावरणपूरक उपक्रम राबवित असते. तलावाची चारी खोलीकरण केल्याने मेहरूण तलावात देखील पाणीसाठा वाढणार असल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/653092462073263/

Protected Content