महात्मा गांधींच्या सूचनेवरून सावरकरांनी दाखल केली होती दया याचिका ! -राजनाथसिंह

नवी दिल्ली वृत्तसंस्था | वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टीशन,या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रूपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याप्रसंगी राजनाथसिंह म्हणाले की, सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली. आणि महात्मा गांधींनी सावरकरांना सोडण्याचे आवाहन केले होते. गांधीजी ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे म्हणाले होते, असे राजनाथ सिंह म्हणाले.

सावरकरांनी लोकांना गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी आणि स्त्रियांच्या हक्कांसह इतर अनेक सामाजिक समस्यांमध्ये अस्पृश्यतेविरोधात आंदोलन करण्यासाठी खरोखर प्रेरित केले. मात्र, देशाच्या सांस्कृतिक एकतेसाठी त्यांचे योगदान दुर्लक्षित केले गेले. २००३ मध्ये सावरकरांचे चित्र संसदेत लावण्यात आले होते तेव्हा बहुतेक राजकीय पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला होता, तर सरकार बदलल्यावर अंदमान आणि निकोबार कारागृहात त्यांच्या नावाचा फलक काढून टाकण्यात आला होता, असेही सिंह म्हणाले.

दरम्यान, यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही मेळाव्याला संबोधित केले. भागवत म्हणाले की, सावरकर कठोरपणे बोलले म्हणून लोकांचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते असा युक्तिवाद मोहन भागवत यांनी यावेळी केला.

Protected Content