भुसावळ प्रतिनिधी । अनेक वर्षांच्या मागणीनंतर आता मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस भुसावळ-नाशिकमार्गे धावणार असून यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
राजधानी एक्सप्रेसला मोठ्या प्रमाणात वलय आहे. यातून अधिक गतीमान प्रवास होत असल्यामुळे प्रवाशांची याला पसंती मिळाली आहे. तथापि, भुसावळमार्गे अर्थात मध्य रेल्वेतून कोणतीही राजधानी एक्सप्रेस धावत नसल्यामुळे इच्छुक प्रवाशांची कुचंबणा होत होती. राजधानी एक्सप्रेस ही भुसावळमार्गे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी खासदार रक्षाताई खडसे, खासदार ए.टी. पाटील व हेमंत गोडसे यांनी दीर्घ काळ पाठपुरावा केला. याला आता यश लाभले असून शनिवार म्हणजेच १९ जानेवारीपासून मुंबई ते दिल्ली ही राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेमार्गावरून धावणार आहे. जळगाव आणि नाशिक येथे राजधानी एक्सप्रेस थांबणार आहे.
डाऊन मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (२२२२१) आठवड्यातून दोन दिवस दुपारी २.५० वाजता सुटेल. ही गाडी मुंबईतून सुटल्यावर कल्याण, नाशिक, जळगाव, भाेपाळ, बिना, झांशी, अाग्रा कॅँट, पळवल या स्थानकांवर थांबेल. गाडीला नाशिकसह जळगाव स्थानकात अधिकृत थांबा दिला अाहे. हजरत निजामुद्दीन वरून मुंबईला जाण्यासाठी अप राजधानी एक्स्प्रेस (२२२२२) दुपारी ४.१५ वाजता गुरूवारी अाणि रविवारी सुटणार अाहे. नाशिकराेडवरून सायंकाळी ५.५६ तर जळगावातून ८.१७ वाजता ही गाडी सुटेल. तर मुंबईकडे जाण्यासाठी ही गाडी जळगावात सकाळी ५.३८ तर नाशिक येथून सकाळी ८.१८ वाजता सुटून मुंबईत सकाळी ११.५५ वाजता पाेहोचेल.