Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भावाच्या भेटीला निघालेला भाऊ बेपत्ता

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । कल्याण येथे भावाला भेटायला जातो असे सांगून  निघालेली  ५० वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची  घटना समोर आली असून पोलिसात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

 

गजानन राजाराम पाटील (वय- ५० रा. धमाने ता. शिंदखेडा जि. धुळे) हे  धमाने येथे परिवारासह वास्तव्यास आहेत.  साडूच्या मुलाचं लग्न असल्याने पाटील १२ जूलैरोजी परिवारासह शहरातील हिरापुर रोडवरील सुयश मंगलकार्यालय येथे आले होते.

 

सकाळी हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गजानन पाटील हे  आई व भाऊ रविंद्र पाटील (कल्याण जि. ठाणे) यांना भेटून येतो असे घरच्यांना सांगून एस.टी बसने निघून गेले. त्यावर मुलगी प्रज्ञा हिने दुपारी ३ वाजेच्या सुमारास वडिलांना संपर्क केला असता चाळीसगाव बस स्थानक येथून पाचोरा-कल्याण बसमध्ये बसून नाशिक जवळ पोहोचलो असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलगा नितीन यांनी सायंकाळी ६ वाजता फोन केला असता मोबाईल बंद येत असल्याने त्यांनी काका रविंद्र पाटील याला फोन केला. परंतु भाऊ घरी आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर घरच्यांनी चाळीसगाव परिसर व इतर ठिकाणी शोधाशोध केली असता मिळून आला नाही. त्यामुळे कुठेतरी हरवल्याची खात्री झाल्याने मुलगा नितीन पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास मुकेश पाटील हे करीत आहेत.

 

Exit mobile version