Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भावनाविवश होऊन आत्महत्या करू नका

 

कोल्हापूर : वृत्तसंस्था । मराठा आरक्षणाच्या लढाईत प्रत्येक मावळा लाखमोलाचा असल्याने युवकांनो भावनाविवश होऊन आत्महत्या करू नका असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने बीड तालुक्यातील केतुरा येथील विवेक राहाडे (वय १८) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भावनिक ट्विट केले आहे.

मराठा आरक्षण लढाईतील प्रत्येक मावळा लाखमोलाचा आहे. यामुळे कोणीही असे पर्याय निवडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

”विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलिदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!.”

”माझ्या निडर वाघांनो तुम्हीच असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत.” असे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही, असे संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले आहे.

Exit mobile version