बेमोसमी पावसाच्या नुकसानीच्या निकषांत खरीप हंगामापूर्वी होणार बदल

मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा l राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. पण मदतीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून मदत देण्याचा प्रस्ताव असून शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. याबाबत खरीप हंगामापूर्वी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार विधानसभेत माहिती दिली.

 

राज्यात बेमोसमी पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मदत नाकारण्यात आली आहे. याबाबत सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. या चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांनी ‘गेल्या खरीप हंगामामध्ये मराठवाडय़ात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाप्रमाणे आतापर्यंत तीन हजार ८८५ कोटींची मदत देण्यात आली आहे. शासनाचे निकषानुसार २४ तासांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस आणि ३३ टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान नसलेल्यांना मदत दिली जात नाही. विशेष बाब म्हणून निकषात न बसणाऱ्या मात्र शेतीचे नुकसान झालेल्या ३३ हजार ३०५ बाधित शेतकऱ्यांच्या २४ हजार २९३ हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी २८ लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे पाठविला होता. मात्र तो निकषात बसणारा नसल्याने हि मदत नाकारण्यात आली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
असे असले तरी पुढील हंगामापासून किमान राज्याच्या आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषामध्ये बदल करून किमान तीन दिवसांत १०० मिमी पाऊस झाला आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी निकषात पात्र नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल आणि हि तरतूद लागू केली जाईल ,असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

Protected Content