Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहाटेची पापकृत्य करण्याची यांना सवयच – खा. संजय राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | महाविकास आघाडीतील तीन मते बाद करण्यात यावी अशी भाजपची तर भाजपची २ मते बाद व्हावीत अशी माविआची मागणी होती. परंतु फक्त आमचेच एक मत बाद करीत रात्री उशीरापर्यंत पहाटे काही गोष्टी करण्यात आल्या. पहाटेची पापकृत्य करण्याची यांना सवयच असल्याची टीका प्रसार माध्यमांशी बोलतांना खा. संजय राऊत यांनी भाजपवर केली.

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मलिक, अनिल देशमुख यांची मते नाहीत. आम्ही मुनगंटीवारांच्या मताला आक्षेप घेतला पण आ.सुहास कांदेंचेच मत बाद झाले? हा संशोधनाचा विषय आहे. मतदानावेळी धार्मिक प्रदर्शन करायचे नाही, हे माहिती असूनही अमरावतीच्या शहाण्याने उद्योग केले ते आक्षेपार्ह आहेत. घटनेनुसार त्याचेही मत बाद व्हायला पाहिजे होते. पण झाले नाही. रात्री उशीरा आणि पहाटे काही गोष्टी करण्यात येऊन फक्त आमचे एक मत बाद करण्याचा उपक्रम सुरु होता. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा आणि राज्याचा कायमचा घोडेबाजार करून टाका, अशी टीका शिवसेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभवाच्या पार्श्वभूमीवरप्रसार माध्यमाशी बोलताना केली.

कोणाला पडलेले मत बाद आहे, हे शोधण्यासाठी ७ तास घेतले, हे केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कसे काम करतात हे आम्ही ईडी, सीबीआय, निवडणूक यंत्रणा कशा वापरल्या जातात यांचे प्रत्यक्ष पाहात होतो. आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. याचा अर्थ समोरच्यांनी दैदिप्यमान विजय मिळवला असेहि नाही. अपक्षांची ६ मते आम्हाला मिळाली नाहीत. पण आमच्यातील घटक पक्षांसह छोटे पक्षांचे एकही मत फुटलेले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बच्चू कडू, शंकरराव गडाख, यड्रावकर आणि अन्य अशी ३३ मते आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात उभ्या असलेल्या ६-७ जणांची मते आम्ही मिळवू शकलो नसल्याचे खा. राऊत म्हणाले. आणि ज्यांनी कोणी शब्द देऊन दगाबाजी केली, ती नावे आमच्याकडे आहेत, अशा शब्दांत राऊतांनी सूचक इशारा देखील दिला आहे.

Exit mobile version