जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – मुक्ताईनगर येथील पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांची अन्यायकारकरित्या बदली करण्यात आली असून ती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी मुक्ताईनगर येथील महेंद्र उमाळे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले आहे.
मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली न येता सर्वसामान्य हित रक्षणासाठी कामकाज केले आहे. परंतु त्यांच्याविरुद्ध चुकीचे आरोप लावण्यात आले असून त्यांच्या जागी मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून पोलीस निरीक्षक खताळ यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात बेकायदेशीर कामांना प्रतिबंधात्मक कारवाई केली असून सर्वसामान्य वातावरण निर्भीड आहे. त्यांची बदली झाल्यास पुन्हा मुक्ताईनगर परिसरात बेकायदेशीर कृत्यांना चालना मिळेल असे होऊ नये, हि बदली राजकीय आकसापोटी करण्यात आली असून याचा निषेध करीत, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी मुक्ताईनगर येथील उमाळे यांनी आमरण उपोषण केले असून, मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री, माजी मंत्री एकनाथराव खडसे, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक, जिल्हा पेठ पोलीस ठाणे निरीक्षक आदिना देण्यात आलेल्या आहेत.