पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून पाच जणांनी एकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील धानवड येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर सोंगडा चव्हाण (वय-४०) रा. धानवड ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियासह राहतात. शेतमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ज्ञानेश्वर चव्हाण हे पुण्याचे मुकदम यांच्यासोबत जयराम हरी राठोड यांच्या विरोधात जुन्या वादाच्या कारणावरून पोलीसात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून जयराम राठोड यांनी ५ जून रोजी रात्री १० वाजता घरी जाणाऱ्या ज्ञानेश्वर चव्हाण यांचा रस्ता आडवून पोलीसात का गेला होता.असे बोलून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच श्याम हरी राठोड, विनोद ममराज राठोड, जानकीराम खिमा राठोड आणि दादू ममराज राठोड सर्व रा. धानवड ता.जि.जळगाव यांनी लाकडाने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात ज्ञानेश्वर चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफ्फार तडवी करीत आहे.

Protected Content