पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील येरवडा कारागृहातून पाच कैद्यांनी पलायन केल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. एकाच वेळी पाच कैदी पसार झाल्याने एकच खळबळ उडाली असून पळून गेलेल्या कैद्यांमध्ये मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या तिघा कैद्यांचा समावेश आहे.
अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे,सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण अशी फरार झालेल्या कैद्यांची नावं आहेत. येरवडा कारागृह अंतर्गत तात्पुरत्या वसतिगृहाच्या जेलमधून या सर्व कैद्यांनी पलायन केले. कारागृहातील इमारतीच्या चौथ्या बिल्डींगमधील पाचव्या मजल्यावरील एका खोलीत या कैद्यांना ठेवण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्यांनी खिडकीचे गज कापले आणि पळ काढला. येरवडा कारागृहातील काही कैद्यांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या इमारतीमध्ये हलवण्यात आले होते. यापूर्वीसुद्धा काही कैद्यांनी कारागृहातून धूम ठोकली आहे. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.