Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंपरी-चिंचवड महापालिका लाचखोरी , स्थायी समिती अध्यक्षांसह तिघांना पोलीस कोठडी

 

पुणे: वृत्तसंस्था । पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. नितीन लांडगे यांच्यासह तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

9 लाखाच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नितीन लांडगे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल कारवाई केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या.   सरकारी वकिलांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र कुठलेही पुरावे मिळाले नसल्याने   त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले

 

या सगळ्या प्रकरणात राजकीय षड्यंत्र आहे. लवकरात लवकर दूध का दूध, पानी का पानी होईल, असं भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी म्हटलंय. नितीन लांडगे यांना राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महापालिका निवडणूक जवळ आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल या भीतीने हा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही आमदार लांडगे यांनी केलाय.

 

एसीबीच्या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काल स्थायी समितीची बैठक पार पडली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या कार्यालयात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली गेली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक, लिपिक, संगणक चालक आणि शिपाई अशा पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांचा समावेश आहे.

 

पक्ष खऱ्याच्या पाठीमागे उभा राहील. जे सत्य आहे आणि ह्या प्रकरणाची पडताळणी केली जाईल. येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या हातून सत्ता काबीज करण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेल्याचा आरोप भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे. तर हा आरोप लपविण्यासाठी भाजप केविलवाणा प्रयत्न करत आहे. ना भय, ना भ्रष्टाचारचा नारा देत सत्तेत आलेल्या भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे आम्हाला षडयंत्र करण्याची गरज नाही. जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघिरे यांनी केलाय.

 

Exit mobile version