पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील कृष्णाजी नगर भागात गेल्या १२ दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नसल्याने नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासना विरुद्ध कमालीची नाराजी दिसुन येत आहे. नागरिकांना नाईलाजास्तव बोरिंगचे पाणी प्यावे लागत असल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असुन या परिसरात लवकरात लवकर पिण्याचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी कृष्णाजी नगर भागातील नागरिकांनी केली आहे.
शहरासाठी भडगाव रोडवर पिण्याच्या पाण्याची मोठी पाण्याची टाकी असुन या टाकीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. याच भडगाव रोडवरील दाट वस्ती असलेला कृष्णाजी नगर हा भाग आहे. शहरात इतरत्र ४ ते ५ दिवसांनंतर पाणी सोडण्यात येते. परंतु कृष्णाजी नगर भागात गेल्या १२ दिवसांपासून पिण्याचे पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे कृष्णाजी नगर भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एकीकडे कोरोना महामारीच्या भितीने नागरिकांचे घराबाहेर निघणे कठीण झाले असतांनाच आता या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी सोडण्यात आले नसल्याने नाईलाजास्तव नागरिकांना बोरिंग चे पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता कृष्णाजी नगर वासियांना व्यक्त केली आहे. या गंभीर विषयाकडे नगरपालिकेने लक्ष देवुन कृष्णाजी नगर भागात लवकरात लवकर पिण्याचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी काॅलनीतील महिला व नागरिकांनी केली आहे.