Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बु” सरपंच अपात्र

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हाड बु. येथील ग्राम पंचायतीचे सरपंच उदयसिंग राठोड यांनी शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी त्यांना सरपंच व सदस्य पदावरुन नुकतेच अपात्र ठरविले आहे.

कुऱ्हाड बु. ता. पाचोरा येथील ग्राम पंचायतीचे सरपंच उदयसिंग लखिचंद राठोड यांनी खाजगी मालकीची जागा मिळकत असतांना देखील सरकारी गावठान जागेवर अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून राजू सखाराम राठोड व राजू भूरा राठोड यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.

त्यावर सखोल चौकशी होऊन शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करून इंदिरा आवास योजनेतुन राहते घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे, जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी उदयसिंग राठोड यांना सरपंच व सदस्य पदावरुन नुकतेच अपात्र ठरविले आहे.”

याबाबत सर्विस्तर वृत असे की, “सरपंच उदयसिंग राठोड यांचे नावे जागा मिळकत क्रं. १५ ही खाजगी जागा असतांना त्यांनी ग्रा.प. जागा मिळकत क्रं. २१० या सरकारी जमिनीवर विना परवानगी अतिक्रमण करुण घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे व एकत्र कुटुंबासह लाभ घेत असल्यामुळे त्यांना सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून राजू सखाराम राठोड व  राजू भूरा राठोड यांनी ग्रा. प. अधिनियम १९५८ चे कलम १४ जे – ३ प्रमाणे जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे विवाद अर्ज क्रं- २७/०२२ ने तक्रार दाखल केला.

या अर्जावर कायदेशीर सुनावणी होऊन सरपंच यांनी स्वतःची खाजगी जागा मिळकत असताना देखील शासकीय गावठान जागा क्रं. २१० या जागा मिळकती वर इंदिरा आवास योजनेतुन घरकुल बांधकाम केले आहे; तसेच सार्वजनिक जागेवर १६ फुट जादा वाढीव बांधकाम केलेले आहे. सरपंच यांनी स्वतःची खाजगी जागा सुरक्षित ठेऊन शासकीय व सार्वजनिक जागेवर अतिक्रमन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी उदयसिंग लखिचंद राठोड यांना ग्रा. प. सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे.

तक्रारदार राजू भूरा राठोड यांचे वतीने अॅड. विश्वासराव भोसले (पिंपरखेड) यांनी काम पाहिले. निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. या निकालामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले असून जिह्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेत खळबळ उडाली आहे.

Exit mobile version